खासदार सुप्रिया सुळे केंद्रात, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राज्यात महत्त्वाची भूमिका निभावतील
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. येत्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली असून, त्यानंतर राज्य आणि केंद्राच्या राजकारणात मोठे बदल घडतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवी राणा म्हणाले, “राजकारणात अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे आज जे अशक्य वाटत आहे, ते उद्या वास्तवात उतरू शकते. येणाऱ्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल.”
रवी राणा यांनी पुढे बोलताना संभाव्य राजकीय समीकरणांवरही भाष्य केले. “दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी असेल. त्या केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची धुरा सांभाळतील, तर महाराष्ट्रातील पक्ष संघटना आणि राज्यातील नेतृत्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल,” असा दावा त्यांनी केला.
राज्यातील आगामी राजकीय घडामोडींमध्ये हे समीकरण महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बदलत्या परिस्थितीत अनेक राजकीय निर्णय अनपेक्षितपणे घेतले जातात आणि त्यातून नवीन समीकरणे तयार होतात, असेही राणा यांनी सांगितले.
रवी राणा यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत पुन्हा एकदा तर्क-वितर्क सुरू झाले असून, पुढील काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, राणा यांनी केलेल्या दाव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला असला, तरी प्रत्यक्षात कोणते निर्णय घेतले जातात, याकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
About The Author











