
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

जागतिक वारसा समितीची ४७ वी परिषद फ्रान्समधील पॅरिस येथे आज पार पडली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठा साम्राज्यातील बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी भारत सरकारतर्फे युनेस्कोला पाठविण्यात आलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला. त्यात मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा देखील समावेश झाला आहे. त्यामुळे तमाम शिवभक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
मावळ तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे लोहगडला खऱ्या अर्थाने गतवैभव प्राप्त होईल. लोहगड किल्ला व परिसराचा प्रचंड कायापालट होईल. जगभरातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी येतील. नवीन नवीन प्रकल्प या ठिकाणी येतील. पायाभूत सुख सुविधांचा विकास होईल. मावळचे प्रमुख पर्यटन केंद्र लोहगड होईल. त्यामुळे स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल व पर्यायाने या परिसराचा विकास होईल.
लोहगड विसापूर विकास मंच गेवर्षेली २५ अविरतपणे लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. “संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे” या ब्रीद वाक्यानुसार मंचाचे कार्य सुरू आहे. लोहगड पायथ्याला असणाऱ्या शिवस्मारकाचा विकास करून या ठिकाणी भव्य शिवसृष्टी उभी करण्याचा मंचाचा मानस आहे. त्यामुळे येथे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना शिवरायांचा पराक्रमी इतिहास अनुभवता येईल. यासाठी शासनाच्या वतीने भरघोस मदत मिळावी.
– सचिन टेकवडे (संस्थापक, लोहगड विसापूर विकास मंच)
जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी भारत सरकारतर्फे २०२४-२५ साठी सादर होणाऱ्या प्रस्तावात महाराष्ट्रातले नऊ गिरीदुर्ग व तीन जलदुर्ग अशा बारा गडकोटांना नामांकन देण्यात आले होते. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांनी केलेला पराक्रम, लष्करीदृष्ट्या केलेली गडकोटांची बांधणी याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जावी यासाठी केंद्राने एक पाऊल पुढे टाकले आहे. वारसा स्थळाच्या यादीत शिवछत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीसह, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, द्वितीय राजधानी रायगड सह साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग त्याचबरोबर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश केला आहे.
युनोस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडचा समावेश झाल्याबद्दल मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर, गणेश उंडे, चेतन जोशी, बसाप्पा भंडारी, अमोल गोरे आदींसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
About The Author

